पुणे – पुरेशा सुविधांअभावी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूर शासकीय रुग्णालय येथे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सर्व मिळून जवळपास 79 झाली आहे. या घटनांची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार गट) केली आहे.
याबाबत पक्षाच्यावतीने येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी हॉस्पिटलसमोर बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. “राज्यशासनात नैतिकता असेल, तर घटनेची जबाबदारी स्वीकारून डॉ. तानाजी सावंत, हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील, तर दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत,’ अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रकाश म्हस्के, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, किशोर कांबळे, आशिष माने, शैलेश राजगुरू, मनाली भिलारे, फहिम शेख, सागर खांदवे, अश्विनी परेरा, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.