वाई – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या युगपुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह बेताल वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्यावतीने जाहीर निषेध करून संतोष गायकवाड यांनी वाई बंदची हाक देत वाई तहसीलदारांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य करून महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान केला, ही बाब अतिशय निंदनीय आहे. सध्या राजकीय नेत्यांचे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचे धाडस वाढले आहे. अशा चुकीच्या वक्तव्यामुळे समाजात विनाकारण तेढ निर्माण होत आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. पाटील यांनी महापुरुषांबद्दल बोलताना आपल्या जिभेला आवर घालावा व समस्त बहुजनांची जाहीर माफी मागावी अन्यथा बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षातर्फे भविष्यात जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा गायकवाड यांनी दिला. निवेदन देताना निवास घाडगे, कालिदादा घाडगे, रुपेशभाऊ मिसाळ, बाजीगर इनामदार, सिद्धार्थ कांबळे, अविनाश बनसोडे व कार्यकर्ते उपस्थित होते.