नगर – महाविकास आघाडीने निमंत्रण दिले तर आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत, मात्र आघाडीच्या नेत्यांना एमआयएमची मते हवी आहेत. एमआयएमचे नेतृत्व नको आहे, अशी दुटप्पी भूमिका पक्षाला चालणार नाही, असे स्पष्ट मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नगरमध्ये बोलताना व्यक्त केले.
औरंगाबादहून पुण्याकडे जाताना खा. जलील नगरमध्ये थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीत कॉंग्रेसला राहुल गांधी यांचे नेतृत्व हवे आहे. राष्ट्रवादीला शरद पवार यांचे नेतृत्व हवे आहे. मग आमच्या पक्षाला आघाडीमध्ये आमचे नेतृत्व का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन थेट देशाचे पंतप्रधान करतात हे विचार करायला लावणारे आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ‘द काश्मीर फाईल’ चित्रपट येतो. कर्नाटकच्या निवडणुकीत ‘द केरला स्टोरी’ चित्रपट येतो. हे केवळ जाती-धर्मात तेढ निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोप खा. जलील यांनी केला. मात्र कर्नाटकच्या निकालातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कालीचरण महाराजाकडून होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल बोलताना खा. जलील यांनी जोरदार टीका केली. अनेकजण भगवे कपडे घालून साधू होतात, मात्र त्यांच्याबद्दल समाजात आदर असतो असे नाही. असे भगवे कपडे घालणाऱ्यांनी तोंड उघडले की ते गरळ ओकतात असे वाटते. अनेक क्रिमिनल भगवे कपडे घालतात. खरे तर त्यांची जागा जेलमध्येच आहे. आसाराम बापूंचे काय झालं? त्यांचे अनेक भक्त होते.
परंतु आज आसाराम बापू कोठे आहेत? पोलीस, सरकार आणि प्रशासन यांनी जर आपले काम व्यवस्थित केले तर कालीचरण महाराजांसारखे भगवे कपडे घातलेले जेलमध्ये असतील. अन्यथा आम्हालाही पोलिसांनी परवानगी द्यावी, आम्ही कालीचरण महाराजांना योग्य भाषेत उत्तर देऊ असाही इशारा त्यांनी दिला.