नेवासा (राजेंद्र वाघमारे) – चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीने नेवासा तालुक्यात रविवारी कहर करुन प्रचंड प्रमाणात अवघ्या एका तासात फळबागांसह अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले आहे.या वादळात नुकसान झालेल्या फळबाग पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार – खासदारांनी दिले आहेत. त्यामुळे सोमवार (दि.५) रोजी सकाळपासूनच नेवासा तालुक्यातील फळबाग पिकांचे पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे नुकसाग्रस्त फळबाग शेतकऱ्यांना आधार आला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा अर्थिक संकटात सापडला आहे. रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास तालुक्यात चक्री वादळाप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यात फळबागाही नेस्तानाबुत झाल्या. यावेळी गोरगरींबांच्या छतावरील पत्रेही उडून जावून घरेही पडली असल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे फळबागाप्रमाणे गोरगरीबांच्या घरांच्या पडझडीचेही पंचनामे करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. या सोसाट्याच्या वादळामुळे मोठ – मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्तेही काही काळ बंद झाले होते. तसेच विजेच्या पोलवरील तारा तुटून विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेकांची कडाक्याच्या उन्हात मोठी कुचंबना झालेली होती.
नेवासा तालुक्यात या वादळामुळे कमी – अधिक प्रमाणात सर्वांचेच मोठे नुकसान झालेले असून महसूल विभागाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना आमदार शंकरराव गडाख आणि खासदार सदाशिव लोखंडे यांना दिले असल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनाम्याची मोहिम सुरु केली आहे. मात्र केवळ पंचनामे करुन जखमेवर मिठ न चोळता अर्थिक मदतीतही नुकसानग्रस्त बळीराजाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
फळबाग पिकांचे तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे निसर्ग कोपल्यामुळे बळिराजा अर्थिक संकटात सापडला आहे शासनाने केवळ पंचनामेच न करता तातडीने अर्थिक मदत करण्याची मागणी खुपटी येथील प्रगतशिल फळबागधारक शेतकरी संभाजीराव कार्ले पाटील यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना केली.