बारामती (प्रतिनिधी) – दूध संघ सरकारी तिजोरीवर दरोडा टाकत आहेत सरकारमधील अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी त्यात सामील आहे असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान सरकारने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध संघांकडून दूध खरेदीला सरकारने परवानगी दिली आहे.
पंचवीस रुपयांहून अधिक दराने दूध संघांकडून सरकार दूध खरेदी करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र 17 ते 18 रुपये प्रति लिटर दिले जात आहेत. दूधसंघ व सरकार कागदी मेळ घालत आहेत . दुधाचे दर सातत्याने घटत चालले आहेत त्यामुळे गेली तीन वर्षात दूध उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे.
४० टक्केहून अधिक दूध उत्पादन घटले आहे. असे असताना दुधाचे भाव वाढणे अपेक्षित आहे मात्र सातत्याने भाव कमी होत आहेत. याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका करून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने जमा करावेत अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. दूध संघ राज्यातील शेतकऱ्यांना लुटत असून सरकारमधील मंत्री यांची टोळी देखील त्यात सामील आहे. मुख्यमंत्र्यांनी मातोश्री बाहेर पडून राज्यात काय चाललं आहे याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील शेट्टी यांनी यावेळी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अस दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही अशा प्रकारच्या घोषणा देत शहरातून आंदोलनकर्ते प्रशासकीय भवन येथे पोहोचले. प्रशासकीय भवनासमोर राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाठक, अमरसिंह कदम,महेंद्र तावरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे नेते दशरथ राऊत यांनीदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला. राऊत यांनी त्यांच्या भाषणात दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली तसेच सरकारवर सडकून टीका केली.