पुसेगाव -पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील जांब, विसापूर, लोणी, भोसरे, जायगाव, अंभेरी, कोकराळे, जाखणगाव आदी परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसाअभावी पाणीटंचाई, हिरव्या चाऱ्याअभावी होत असलेली जनावराची हेळसांड यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असल्याने एकंदरीतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुसलेला पाऊस कधी बरसणार याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.
तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी पशुपालन करतात. दुधाला बाजारभाव बऱ्यापैकी मिळत असल्याने पशुपालनाला आता कुठे अच्छे दिन आले होते. मात्र, यंदा मान्सूनपूर्व तसेच मान्सूननेही हजेरी न लावल्याने पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची टंचाई भेडसावत आहे.आतापर्यंत जवळ होता नव्हता तो चारा संपल्याने तसेच सर्व जलस्रोत आटल्याने सध्या शेतकरी मक्यापासून व ऊसापासून बनवलेला मुरघास (कुट्टी) चारा विकत घेऊन जनावरे कशीबशी जगवत आहे.
आतापर्यंत दूध उत्पादकांना हा चारा योग्य भावात उपलब्ध होत होता. मात्र, जसजसा पाऊस ओढ देऊ लागला तसतसे या चाऱ्याचा दरही अस्मानाला भिडू लागल्याने शेतकऱ्यांना चारा खरेदी करणे देखील आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना एका टनाला नऊ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
पूर्वी तालुक्यात शेतकऱ्यांकडून ज्वारीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. त्यामुळे उन्हाळ्यात ज्वारीची काढणी झाल्यानंतर पावसाळ्यात हक्काचा चारा म्हणून शेतकरी कडबा गंज लावून जमा सुरक्षित ठेवत असत. मात्र, अलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे पीक घेऊ लागल्यापासून वैरण मिळणं कठीण झाले आहे. सध्या ज्वारीची वैरण मिळणं कठीण आहे व मिळाली तर शेकडा सहा हजार रुपयांनी खरेदी करावी लागत आहे. दुष्काळसदृश स्थितीत शेतकऱ्यांना वैरण उपलब्ध करण्यासाठी अख्खा दिवस खर्च करावा लागतोय.
एकेका शेतकऱ्याकडे कमीतकमी दोन ते जास्ती जास्त दहा जनावरे आहेत. त्यांचं पोषण करणे आता जिकरीचे वाटू लागले आहे. यंदा कोरड्या पडलेल्या विहिरींमुळे चारा पिकांना सिंचन दुरापास्त झाले आहे. एकूणच हमखास उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या दूध उत्पादनावरही पावसाने ओढ दिल्याने संकट आले आहे.
पाऊसपाणी नसल्याने दुष्काळाचा दाह अधिक जाणवू लागला आहे. रणरणत्या उन्हात उघडे बोडके झालेल्या डोंगरात व माळरानवर जनावरं दिवसभर सोडून कसंबसं दिवस मावळेपर्यंत थटवून धरायची असा रोजचा दिनक्रम सुरू आहे. मात्र, संध्याकाळी वैरणीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागत आहे.”
बाबू देशमुख , शेतकरी, जांब, ता. खटाव