मुंबई – एसटी कर्मचारी संपावर अद्यापही मार्ग निघाला नाही. राज्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान आज एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते काल न्यायालयात गैरहजर राहिल्याने आज पुन्हा ही सुनावणी होणार आहे.
एसटी महामंडळाने काल न्यायालयात अवमान याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली असता मुख्य न्यायमूर्तींनी यावर कर्मचारी संघटनेच मत किंवा युक्तीवाद जाणून घ्यायचा असल्याने घाई करू नका, असे निर्देश महामंडळाला दिले आहेत. तर राज्य सरकारकडून अहवाल स्वीकारण्यात आला आहे. मात्र विलीनीकरण शक्यच नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. त्यामुळे आज न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
दरम्यान, अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले अथवा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. तर दुसरीकडे काही एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये घेण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.