नगर -जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याने माणसांबरोबरच पशुधनही हैराण झाले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो मात्र जनावरांना तसे काही करता येत नाही. त्यामुळे या वाढत्या उन्हाळ्यात जनावरे, पाळीव पक्षी यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.
वाढत्या तापमानाचा जनावरांना त्रास होत आहे. या काळात जनावरांना उष्माघाताचा त्रास होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जनावरांची काय काळजी घ्यावी, उष्माघाताची काय लक्षणे आहेत, जर जनावरांना त्रास होऊ लागला तर काय उपाययोजना कराव्यात याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. याबाबत विभागाने ग्रामपंचायत आणि पशुवैद्यकिय केंद्रांमार्फत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या वातावरणाचा तर कोंबड्यांना आधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा खर्च करावा लागत आहे. या पाळीव पक्ष्यांची काय काळजी घ्यावी याबाबत विभागाने सूचना दिल्या आहेत.
पोल्ट्रीच्या छताला दोन्ही बाजूंनी चुना मारावा त्यामुळे तापमानात घट होते. शेडच्या जाळ्या स्वच्छ कराव्यात, पक्ष्यांसाठी जागा जास्त असावी, खाद्य देण्याच्या वेळेत बदल करावे, सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळेत खाद्य द्यावे अशा काही सूचना दिल्या आहेत.
उष्माघाताची लक्षणे काय
<जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, कातडी कोरडी पडते, हृदयाचे ठोके वाढतात, त्वचा लालसर होते, पाय आणि पोटाचे स्नायू आखडतात, जनावर धापा टाकते. अशक्तपणाही जाणवतो. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात.
उपाययोजना काय
<या काळात जनावरांना संतुलित आहार द्यावा, जनावरांवर थंड पाण्याचा शिडकावा करावा, जनावरांचे गोठे हवेशीर असावे, जनावरांना उघड्याव बांधू नये, पत्र्यावर गवताचा थर टाकावा, जनावरांची वाहतूक उन्हात करू नये.