आठवणी या शापही आहेत आणि वरदानही. कारण त्या सुखाच्या आणि दु:खाच्या अशा दोन्हीही असतात. कुणी काय लक्षात ठेवायचं, काय विसरायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं लागतं. पण खरंच किती आठवणी आहेत, नाही का? माणसांच्या, जागेच्या, गावांच्या, प्रवासाच्या, लहानपणीच्या, तारुण्यातल्या, आनंदाच्या याला काही गणतीच नाही.
माणसाला एकटेपणा जाणवत असेल तर या आठवणी त्याची सोबत करतात आणि तासन्तास वेळ कसा गेला हे कळत नाही. काही आठवणी तर अशा असतात की आपल्याला एकटं असतानाही हसू येतं. गंमत वाटते. आपला झालेला अपमान खूप वर्षांनी आठवला तरी उदास वाटतं. पण ते आठवायचचं कशाला, नाही का? ज्यामुळे आपला मूड खराब होईल. मृत व्यक्तीच्या आठवणी मनात असतात. जे जवळचे असतात ते त्या व्यक्तीचे गुण आठवतात तर काहीजण वाईट गोष्टी, दुर्गुणही आठवतात. प्रेमभंग झालेल्या व्यक्तीला त्या आठवणी व्याकूळ करत असतात.
आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे
अगदी अशी अवस्था होते. ते विसरायला काही काळ जावा लागतो. आयुष्यात मिळालेला मान, झालेलं कौतुक परत परत आठवावेसं वाटतं कारण ते सकारात्मक ऊर्जा देतं, नवीन काही करण्यासाठी प्रेरणा देतं. आनंददायी प्रवासाच्या जशा आठवणी असतात, तशा अडचणी आलेल्या प्रवासाच्या आठवणीही असतात; पण त्या अडचणीतून मार्ग कसा काढला, याबद्दल स्वत:चे कौतुक केले जाते. आत्मचरित्र लिहिताना व्यक्ती या आठवणींना उजाळा देत असते. आपलं गाव, घर, कुटुंब, जुने सवंगडी यांच्या आठवणी जागवत असते. आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्यांचे आभार मानते.
अलीकडे फेसबुक, व्हॉट्सऍपवर एकाच शाळेत किंवा महाविद्यालयात शिकलेल्या व्यक्ती असे गट तयार करून आठवणी जागवतात. अशाप्रकारे एका गावात राहणारे, एकाच ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांचे गट असतात. एकाच गावात राहणाऱ्या व्यक्ती तिथे घडलेल्या पूर, दंगल, शहरातले बदल याविषयीच्या आठवणी शेअर करतात. पूर्वी स्त्रिया मोकळेपणाने बोलत नसत. स्वत:ला व्यक्त करू शकत नसत. त्या आठवणी, त्या वेळेपासून मनात साचून राहिलेल्या आठवणी काहींनी आत्मचरित्रात मांडल्या आहेत.
आवडीचा चित्रपट पुनःपुन्हा आठवला जातो. बहुतेकांना आपल्या चुका न आठवता इतर व्यक्ती कशा चुकीचे वागल्या इतकंच आठवतं. आठवणींना सय असंही म्हटलं जातं. सासुरवाशीण तर सणवार आला, एखादा नावडता प्रसंग घडला की माहेरच्या आठवणीत रमून जातात आणि दु:ख विसरतात. वृद्ध व्यक्तींना अलीकडच्या काळातल्या घटना आठवत नाहीत पण पूर्वीच्या घटना आठवतात. याचं आश्चर्य वाटतं. भावंडांच्या लहानपणीच्या आठवणी जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या असतात. कारण अनेकदा मोठेपणी त्यांच्यात कटुता आलेली असते. काहीजण दुसऱ्याकडून उसन्या घेतलेल्या वस्तू आता आठवत नाही म्हणून द्यायचं टाळतात. एखादी कटू आठवण निघाली आणि समोरच्या व्यक्तीला ते नको असेल तर मला ते आठवायचंही नाही असं म्हणून विषय टाळते. अशा या हव्याशा आणि नकोशा आठवणी.
– नीलम ताटके