टीव्हीवर बालदिनानिमित्त कार्यक्रम बघत होते. माझी मुलगी श्रावणीही जवळ बसली होती. हल्ली टीव्हीवर कोणत्याही प्रसंगी मग तो एखादा सणवार असो, राष्ट्रीय दिन असो वा आणखी कसला दिन असो, कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. प्रत्येक वाहिनीवर काही ना काही कार्यक्रम असतोच. त्यामुळे हा बघू की तो बघू असा प्रश्न पडतो. टीव्हीचा रिमोट श्रावणीच्या हाती असला, की ती एकही कार्यक्रम शांतपणे आणि पूर्णपणे पाहात नाही. सारखे चॅनल्स बदलत राहते. पण काल मात्र लहान मुलांसाठी असलेला चित्रपट पाहताना ती चॅनल्स बदलण्याचे विसरून गेली होती. टीपॉयवर रिमोट ठेवून शांतपणे, डोळ्याची पापणीही न लवता अगदी एकटक बघत होती चित्रपट. ते पाहून मला तिची अगदी दृष्ट काढावीशी वाटली.
खरंच हल्ली मुलांसाठी किती छान छान कार्यक्रम असतात. सर्वच दृष्टीने सुरेख. मनोरंजक आणि ज्ञानवर्धकही.
पण श्रावणीप्रमाणेच बहुसंख्य मुलांची पहिली पसंती असते ती कार्टूनना. केवळ मनोरंजनापलीकडे त्या कार्टून्समध्ये फारसे काही असते, असे मला तरी वाटत नाही. पण मुले तहानभूक विसरून ती बघत बसतात हे मात्र खरे.
श्रावणी इंग्रजी माध्यमात सेकंडला, म्हणजे आपल्या भाषेत दुसरीत शिकत असली तरी तिचे मराठी चांगले आहे. इंग्रजी इतकेच मराठीही आवडीने वाचते. मराठीतील गोष्टीही तिला आवडतात आणि मुख्य म्हणजे चांगल्या समजतात.
आम्ही बघत असलेल्या त्या चित्रपटात एक पडका वाडा दाखवला होता. मुले त्या पडक्या वाड्यात खेळताना दाखवली होती. सिनेमातला तो वाडा पाहिल्यानंतर श्रावणीला एकदम गावातील तिच्या मामाचा वाडा आठवला. त्यावरून “चांदोबा चांदोबा भागलास का’ हे गाणे आठवले आणि ती सहजपणे अगदी मोठ्यांदा म्हणू लागली,
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खाऊन जा…
तुपात पडली माशी चांदोबा गेला उपाशी…
तिच्या मामाचा वाडा हल्लीच, दोन-चार वर्षांपूर्वी पाडला गेला आणि त्या ठिकाणी एक पाच मजली इमारत उभी राहिली आहे. पण वाडा पाडल्यानंतर मला आता तेथे जावेसे वाटत नाही. तेथील फ्लॅटमध्ये राहायला मन घेत नाही. मलाही नाही आणि श्रावणीलाही नाही. त्या वाड्याशी माझ्या बालपणीच्या किती तरी आठवणी जुडलेल्या आहेत. माझे बालपण तेथेच गेले. समजायला लागल्यापासून ते विवाह होऊन गाव सोडेपर्यंतचे सारे आयुष्य त्या वाड्यात गेले होते.
तो वाडा पाडणे आवश्यक होते. व्यवहाराच्या दृष्टीने. त्यामुळे विरोध करून काही फायदा होणार नव्हता. मात्र, वाडा पाडल्याने मनाला एक मोठी भळभळती जखम झाल्यासारखी वाटत होती. वाडा असताना वाड्याच्या मधल्या अंगणात सारी मुले एकत्र खेळत. आता संकुल उभे राहिल्यापासून सर्वांची दारे सदैव बंद. मुलेही बाहेर दिसत नाहीत.
पूर्वी वाड्यात राहणारी बहुतेक कुटुंबे त्या इमारतीत राहू लागली आहेत. मात्र जागा बदलल्यानंतर साऱ्यांची मनेही बदलली आहे. फ्लॅट संस्कृतीचे बंद दाराचे वारे वाहू लागले आहे. पूर्वीसारख्या भेटीगाठी, येणेजाणे, देणेघेणे बंद झाले आहे. मुलेही घरातच बंदिस्त असतात. नाही म्हटले तरी माणसेही परिस्थितीनुसार बदलतात. बदलावेच लागते त्यांना. पण माझ्याप्रमाणेच त्यांच्याही मनात वाड्याच्या आठवणी जागत असतील का? आत कोठे तरी एक सुगंधी जखम भळभळत असेल का?
योगिता जगदाळे