पिंपरी – क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे असून देशासाठी भूषणावह आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करुन स्मारक देशासाठी प्रेरणास्थळ बनविले आहे. स्मारकामुळे नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होईल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्चे भटक्या-विमुक्तांच्या सशक्तीकरणासाठीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरद्गारही त्यांनी काढले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ राज्यपाल बैस यांच्या उपस्थित मंगळवारी (दि.12) पार पडला. समितीचे अध्यक्ष, पद्मश्री गिरीश प्रभुणे, विश्वस्त मिलींद देशपांडे, कार्यवाह ऍड सतिश गोरडे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, कोषाध्यक्ष रवी नामदे, निता मोहिते, शकुंतला बन्सल, अशोक पारखी, नितीन बारणे, सुहास पोफळे, आसाराम कसबे, राहुल बनगोंडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस यांनी चापेकर वाड्याला भेट दिली. वाड्याची माहिती घेतली. त्यानंतर पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् ला भेट दिली. गुरुकुलममधील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला.
राजभवनाचे दरवाजे खुले
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्य वाखणण्याजोगे आहे. समितीसाठी राजभवनाचे दरवाजे सातत्याने खुले आहेत, असेही राज्यपाल बैस म्हणाले. प्रास्तविक गिरीश प्रभुणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दिंगबर ढोकले यांनी तर, ऍड सतिश गोरडे यांनी आभार मानले.