श्रीनगर – भाजपविरोधात एकवटण्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या भूमिकेला जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट करण्याची आवश्यकता असल्याचे मेहबुबा यांनी म्हटले आहे.
ममतांनी पाठवलेल्या पत्राबाबत मेहबुबा यांनी त्यांचे ट्विटरवरून आभार मानले. ममता यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विरोधकांना चिरडण्यासाठी भाजपकडून बहुमताचा वापर कशाप्रकारे केला जात आहे; ते दिल्लीशी संबंधित विधेयकाच्या मंजुरीवरून पुन्हा एकदा दिसून आले.
ती प्रक्रिया 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या माध्यमातून सुरू झाली. दुर्दैवाने, त्या एकतर्फी आणि अवैध पाऊलाविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधी बाजूकडील अनेक जण पुढे आले नाहीत, अशी खंत मेहबुबा यांनी व्यक्त केली. केंद्रीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांची छळवणूक केली जात असल्याच्या ममतांच्या आरोपाचीही त्यांनी री ओढली.