मुंबई – मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीतील कारशेडची जागा तेथून हलवून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि कांजूरमार्गच्या मिठागराची ही जागा आमच्या मालकीची असल्याचा जो दावा केंद्र सरकारने केला आहे त्यावर मुंबईच्या महापौरांनी आक्षेप घेतला आहे.
त्यांनी म्हटले आहे की कांजूरमार्गची ती जागा राज्य सरकारच्याच मालकीची असल्याचे एक प्रतिज्ञापत्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात दिले आहे. आता मग मुख्यमंत्री बदलला की जमिनीची मालकीही बदलते काय, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, या जागेच्या संबंधात केंद्र सरकारला नक्की नेमकं कोण काय सांगतेय याबाबत आम्हीही संभ्रमात आहोत. आरेतील कारशेड हलवल्यामुळे तेथील वनसंपत्तीचे रक्षण होणार आहे. राज्य सरकारची ही भूमिका अगदी रास्त आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कांजूरमार्ग येथे मेट्रोची कारशेड उभारल्यामुळे आता कल्याणपर्यंतच्या लोकांना त्याचा फायदा होईल, असेही महापौरांनी नमूद केले आहे. मिठागराची जागा केंद्र सरकारची आहे असे जरी गृहीत धरले तरी विकासकामांसाठी अशा जागा वेळोवेळी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे कोणत्यातरी सबबीखाली राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचे काम होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला कोंडीत पकडण्याचे राजकारण करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.