लोणंद – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा उद्या दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे. यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे.
लोणंदमधील मुक्काम आटोपल्यानंतर पुढील मुक्कामासाठी फलटण तालुक्यातील तरडगाव हद्दीत माउलींचे पहिले ऊभे रिंगण होऊन संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा विसावेल. जिल्ह्यात आगमन होताच पाडेगाव हद्दीत दत्तघाट येथे माउलींच्या पादुकांना नीरा स्नान होणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने माउलींचे स्वागत समता आश्रम शाळेसमोर करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने मंडप उभारून सुशोभिकरण करण्यात आले आहे.
यावेळी आगमन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. सोहळा कालावधीत पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना जलद आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत पथके व फिरती पथके कार्यरत असणार आहेत. याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात पोहचल्यावर लोणंद नगरपंचायतीच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन माउलींची पालखी लोणंद मुक्कामाला पालखीतळावर विसावेल.