मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आला, याचवेळी मंदिरातील जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्तींची स्थापना करण्यात आली. मंदिरात मुख्य गाभाऱ्यापुढे मोठे सभागृह आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मूर्तीसह गाभाऱ्यासमोर गरूड विराजमान आहे. मंदिराच्या सभागृहातच माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातात. मंदिरात वर्षभरात तीन मोठे सप्ताह होतात. कृष्णजन्माष्टमी, संत सावतामहाराज जयंती आणि तुकाराम ीज यावेळी येथे अखंड वीणा वादन आणि भजन होते.
सप्ताहकाळात गाथा पारायण केले जाते. ज्ञानेश्वरी पायारायण आणि चंदन उटीचाही सोहळा येथे होते. महिन्याच्या दोन्ही एकदशींना येथे काकडा-भजन होते. रोजच्या हरिपाठासह आठवड्याचे भजन असते. आषाढी एकादशीला दिवसभर खिचडीचे वाटप भाविकांना केले जाते. या मंदिरात पूजेची व्यवस्था बाळासाहे तांबेकर पाहत असून प्रमोद बेंगरूट, तेजेंद्र कोंढरे, गोरखनाथ भिकुले, शिवाजी जगदाळे, धनंजय बडदे, ताराबाई बेंगरूट हे विश्वस्त आहेत. कोजागरी ते त्रिपुरारी काकडा भजन असते. दरम्यान, आळंदीला जाणाऱ्या दिंड्यांचा मुक्काम येथे असतो. पालखी परतीचाही मुक्काम दोन दिवस येथेच असता.
डाळीच्या मिलची पटांगणे…
भवानी पेठेच्या या परिसरात त्यावेळी काही खासगी डाळीच्या मिल होत्या. या डाळी भरडल्या की त्या पंटांगणात पसरवून वाळवल्या जायच्या. ही पटांगणे वारी येण्याच्या वेळी सारवून स्वच्छ करून वारीसाठी सज्ज ठेवली जात होती. या भागात कात्रजवरून पाणी येत होते, पर्यायाने राहण्यासाठी मोकळे मैदान, मुबलक पाणी आणि बैलांसाठी चारा यांची उपलब्धता असल्याने वारीचा मुक्काम पुण्यातील या ठिकाणी महत्त्वाचा ठरला आहे.
वारकऱ्यांसाठी निवासस्थान…
या भागातील व्यापारी कृष्णाजी विठोजी पानसरे यांनी मंदिरापासून 50 मीटरवर एक निवासस्थान त्याकाळी केवळ वारकऱ्यांसाठी बांधले आहे. आज त्याचा विस्तार झाला आहे. चार मजली या निवासस्थानात राम मंदिर आहे आणि पुढे सभागृह असून येथे वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली जाते. या मंदिरात माऊलींच्या सोहळ्यातील दिंडी क्र. 1 खडकतकरांच्या दिंडीचा मुक्काम असतो.
पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आल्या की पालखी विठोबा मंदिर हे त्यांचे मुक्कामाचे ठिकाण. भवानी पेठेतील या मंदिरात माऊलींचा मुक्काम दोन रात्र आणि एक दिवस असतो.
माऊलींच्या पादुकारूपी अस्तित्वाने पावन झालेल्या मंदिराचे स्थान पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पुणे शहर हे पुनवडी म्हणून ओळखले जात होते तेव्हापासून हे मंदिर 300 वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याच्या खुणा सापडतात. पत्राशेडमधील मंदिर परिसर मोकळे मैदान होते. हैबतबाबांनी माऊलींच्या पादुका गळ्यात घालून नेण्यास प्रारंभ केला तेव्हापासून या मंदिरात पादुकांचा मुक्काम इथे ठरलेला आहे.
माऊलींना नैवेद्य आणि निरोप…
माऊलींची पालखी मुक्कामाला आली की या ठिकाणी पादुकांचे, माऊलीच्या अश्वांचे स्वागत केले जाते. आरती करून दही-भाताचा नैवेद्य दाखवला जातो, यालाच माऊलींची दृष्ट काढणे असेही म्हणतात. दुसऱ्या दिवशी पहाटे पंचामृताचा अभिषेक होतो, दुपारी मुख्य नैवेद्य झाला की मंदिर संस्थानचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. रात्री भजन-जागर असतो. मंदिरात पादुका आल्यापासून प्रस्थानापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. प्रस्थानादिवशी सर्व विश्वस्त हडपसरपर्यंत माऊलींना सोडायला जातात.