नंदुरबार – करोना संसर्गामुळे भावाचा मृत्यू झाल्यानंतर विधवा झालेल्या वहिनीसोबत दीराने विवाह केला आहे. नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह थाटात संपन्न झाला. या अनोख्या लग्नामुळे गावातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, धुळे येथील रहिवासी असलेले उच्च शिक्षित संदिप चंद्रकांत बडगुजर पुणे येथे नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. चेतना आणि संदिप यांचा 2015 साली विवाह झाला होता. संसार सुखात चालू होता. त्यांना एक मुलगी झाली. दिव्यांका (वय 5 वर्ष) असे मुलीचे नाव आहे. मात्र करोना महामारीत संदिपचा पुणे येथे गेल्यावर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सुखी संसारावर दु:खाचा डोंगर कोसळला. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले. चेतना देखील पतीच्या विरहाने खचून गेली होती.
सासर व माहेरकडील मंडळींनी चेतनाची समजूत घालून विचार विनिमय करून चेतना व दीर हर्षल ऊर्फ किरण यांना भावी जीवनाची भूमिका पटवून सांगितली. चेतना व हर्षल यांनी सर्वांचे मत विचारात घेतले. त्यानंतर दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.
मुलगी दिव्यांका हिचे पालन पोषण व भविष्यातील सर्व सुख, दुःख सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चेतनाचा स्वीकार केला. चेतनानेही दीरासोबत लग्न करण्यास संमती दिली. सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह थाटात पार पडला. दोघांच्या विवाहानंतर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.