अरुण गोखले
आपल्या संस्कृतीने निसर्ग आणि निसर्गातील वृक्ष, पाने, फुले आणि फळे ह्यांना आपल्या जीवनात आदरणीय आणि पूजनीय स्थान दिलेले आहे. आपल्या संस्कृतीने जसे काही वृक्षांना पूजनीय मानले आहे तसेच काही फळांनाही विशेष प्राधान्य दिले आहे. त्यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजेच कल्पवृक्षाचा नारळ.
नारळाला धार्मिक कार्याच्या संदर्भात श्रीफळ ह्या नावाने संबोधले जाते. श्रीफळ हे मांगल्य, पावित्र आणि शुभ मानले जाते. अनेक देव देवतांच्या आणि सत्यनारायण, वास्तू शांत, पुण्याहवाचन इत्यादी कार्याच्या वेळी जो पूजेसाठी कलश तयार केला जातो त्यावर त्या श्रीफळासच विराजमान होण्याचा मान आहे.
नारळ हे नारळाच्या झाडाचे फळ आहे. ते एक कठीण कवचाचे फळ असून त्याच्या आत रुचकर खोबरे आणि गोड पाणी मिळते. नारळापासून अनेक खाद्य पदार्थ बनविले जातात. त्यापासून ओले खोबरे, वाळलेले खोबरे, खोबऱ्यापासून खोबरेल तेल इत्यादी पदार्थ मिळतात. नारळाच्या झाडाचे बहुविध उपयोग आणि त्यातून होणारी अर्थप्राप्ती ह्या वरूनच या वृक्षाला आपल्याकडे कल्पवृक्ष असे म्हटलेले आहे.
नारळाचे झाड येते जमिनीवर, भरपूर उंच आणि त्या उंचीवर येणाऱ्या फळात म्हणजेच नारळात मिळणारे गोड पाणी ह्या चमत्कारावरूनच “देवाची करणी आणि नारळात पाणी’ ही सार्थ म्हण आपल्याकडे रुढ झालेली आहे.
मंगलकार्याच्या प्रारंभी दारावर नारळाचे तोरण लावणे, शुभारंभाचा नारळ फोडणे, मानसन्मानार्थ नारळ देणे, खणा नारळाने देवीची, सवाष्णीची ओटी भरणे, प्रसादाचा नारळ हाती किंवा ओटीत देणे, या सारख्या गोष्टीत या नारळाचा आवर्जून वापर केला जातो.
एका बुक्कीत नारळ फोडणे हे पुरुषार्थाला, शक्तिप्रदर्शनाला एक प्रकारचे आव्हानच असते. या नारळाबाबत आणखीही एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे आपण आणि देवदेवता ह्यांच्या मधील संवादाचे ते एक माध्यम आहे. माणसाने त्याच्या मनातल्या इच्छा, कामना, अपेक्षा या नारळामार्फत देवास सांगायच्या असतात. संकल्पाचा नारळ ठेवणे, पाच, अकरा, एकवीस नारळांचे तोरण वाहीन असा नवस करणे, ह्यागोष्टी तर आपल्याला चांगल्याच परिचयाच्या आहेत.
या बाह्य प्रतीकात्मक नारळाबरोबरच आपण आपले शीर म्हणजेच देहघटावरचा नारळ विनम्रपणे देवापुढे झुकवायचा, लिनतेने अर्पण करायचा असतो. ह्यालाही जीवनात फार मोठे महत्त्व आहे. श्रीफळ हे यश आणि संपदेचे प्रतीक आहे.