पुणे – पावसाने मागील आठवड्यात काहीकाळ उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात वाढली आहे. त्यातच हॉटेल, खानावळी सुरू होणार असल्याने फळभाज्यांना मागणी वाढली आहे.
हिरवी मिरची, सिमला मिरची, कारली, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी, लसुण आणि भुईमुगाच्या भावात वाढ झाली आहे. तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्यामुळे टोमॅटो, शेवगा, भेंडी आणि दुधी भोपळाच्या भावात घट झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. हंगाम सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.
स्थानिक मटारचा हंगाम संपला असून, मटारची सध्या परराज्यातून आवक होत आहे. त्यामुळे मटारचे भाव तेजीत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.