राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी, वर्धा – आपल्या सर्वांच्या जीवनात साहित्याला खूप महत्त्व आहे. कारण साहित्यातूनच समाज बदलतो. समाज जीवन घडविण्याचे प्रतिबिंब साहित्यात असते. त्यामुळे राष्ट्रहितासाठी साहित्यिकांनी निर्भिडपणे आपले विचार मांडायला हवेत, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या समारोप कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.
वर्धा येथे आयोजित ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/pTVP7YgQyB
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 5, 2023
नितीन गडकरी म्हणाले, जीवनात शिक्षण, आरोग्य, उद्योग, विकास या क्षेत्रांप्रमाणेच साहित्याची देखील महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे मतभेद हवेत, मात्र मनभेद होता कामा नयेत. संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकलो नाही याचे मला दुःख आहे. वर्ध्याच्या जनतेने खूप सहकार्य केले म्हणून हे संमेलन यशस्वी झाले. वर्ध्यात संमेलन होत झाले, याचा खूप आनंद आहे. ही भूमी महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची आहे. याच भूमीत सिंधुताई सपकाळ, पांडुरंग खानखोजे यांच्यासारखे लोक घडले.
साहित्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. पुढच्या पिढीच्या विकासासाठी साहित्यिक देखील विचार करीत असतो. महाराष्ट्रामधील साहित्यिक आणि संत यांच्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आदर्श व्यक्ती तयार करायचा असेल तर त्याचा संबंध संस्काराशी असतो. संस्कारांचा संबंध साहित्याशी असतो आणि साहित्याचा संबंध विचारांशी असतो. त्यामुळेच माणसाच्या आयुष्यात साहित्याला खूप महत्त्व असल्याचे त्यांनी सांगिले.