10 तासानंतर सर्वांची सुखरूप सुटका, ग्रामस्थांच्या मारहाणीत आरोपीच्या पत्नीचा मृत्यू
फारूखाबाद : खूनाचा आरोप असलेल्या सूभाष बाथम या व्यक्तीने मुलीच्या वाढदिवसाला बोलावून ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. जवळपास 10 तास हे ओलीस नाट्य रंगले. पोलिसांच्या करवाईत बाथम मारला गेला. तर संतप्त ग्रामस्थांच्या मारहाणीत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.
हे नाट्य शुक्रवारी दुपारी रंगले. सुमारे दहा तास ते चालले. पोलिस आणि दहशतावाद प्रतिबंधक पथकाने बाथला ठार करून या मुलांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या पत्नीला घराबाहेर खेचू बेदम मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत न्यायलयात दाखल करण्यात आले. तेथे त्या मरण पावल्या.
आरोपीला कंठस्नान घातले आहे . 23 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी रात्री रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या आरोपीने या मुलांना त्याच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे सांगून निमंत्रीत केले होते. त्यांना त्यानंतर ओलिस ठेवले. गुरूवारी दुपारी पाचच्या सुमारस या नाट्याला सुरवात झाली. त्याचा शेवट आठ तासांनी झाला. या सर्व काळात आम्ही आरोपीला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे पोलिस महासंचालक ओपी सिंह यांनी सांगितले.
मोहमदाबाद भागात ही घटना घडली. बाथमने त्याच्या वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आजुबाजुच्या मुलांना घरी बोलावले. मुले आल्यानंतर त्याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून कोंडून ठेवले. काही वेळाने मुले घरी परतली नाही म्हणून शेजारी त्याच्या घरी जाऊन दार वाजवू लागले. त्यावेळी त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. जेव्हा त्यांनी दार उघडायचा प्रयत्न केला तेंव्हा त्याने आतून गोळीबार केला. त्यात एकाच्या पायात गोळी लागली.
पोलिस घटनास्थळावर पोहोचले त्यावेळी त्याने कमी तीव्रतेचे बॉम्ब फेकले. त्यांनतर एटीएसही या मोहीमेत सहभागी झाली. पोलिसांनी काही तास त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाथमने मुलांना सोडण्यास नकार दिला.
त्याने मारला जाण्याच्या आधी बराच काळ एका सहा महिन्याच्या बाळाची सुटका केली. त्याने या बाळाला घराच्या बाल्कनीतून शेजाऱ्यांच्या ताब्यात दिले. या मुलाला त्याने दिले, त्यावेळी तेथे मोठा जमाव जमला होता. त्यातील अनेक जण त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मध्यरात्रीनंतर पोलिस त्याच्या घरात मागच्या बाजूने घुसले त्यांनी बाथमला गोळी घालून ठार केले. 2001 मध्ये बाथमवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचा उद्देश स्पष्ट झाला नाही.
कानपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक मोहित अग्रवाल म्हणाले, वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्याने मुलांना बोलावले. त्यांना तळघरात कोंडून ठेवले. त्याने घरातून सहा गोळ्या झाडल्या. बाथमने सुरवातीला स्थानिक आमदाराशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ते आल्यावर त्याने बोलण्यास नकार दिला. या कटात त्याची पत्नी सहभागी होती नाही याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही.