Sanjay Raut : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची वेळ दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या मराठा कुटुंबाकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.
यावर आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी नेते करत आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा नेते आमने- सामने आले आहेत. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडणं होत आहेत. मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. मंत्री एकमेकांना मारतील इतकं वातावरण बिघडलं आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे. ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाहीत. तर राज्याचा प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.”
पुढे ते म्हणाले “मुख्यमंत्र्यांना कोणीच जुमानत नाही. मुख्यमंत्री हे दिल्लीने लादलेले आहेत असल्यामुळे भाजपावाले त्यांना जुमानत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे मराठा-ओबीसी विषयावर सध्या कॅबिनेटमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे.”
“मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबरनंतर या महाराष्ट्रात काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्यानं घेतलं नाही. तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.