मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणाले आहेत.
आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही. आमरण उपोषणातून जी जनजागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षणासाठी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी आंबेडकरांनी जरांगे लोकसभेच्या निवडणुकीत बिनधोकपणे निवडून येतील असा दावाही केला. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. आमची भूमिका ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.
मराठा-ओबीसींचे ताट वेगळे असावे
गरीब मराठ्यांचे व ओबीसींचे ताट वेगळे हवे अशी भूमिका आम्ही यापूर्वीच स्पष्ट केली आहे. ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. असे झाले तर हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळे असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.