Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच केली असून, मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या सोबत या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. असं जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटलं होत.
सध्या मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यात दाखल झाली असून खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. २६ जानेवारी मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. पुण्यात मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राजकारण प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. जरांगे पाटील एखाद्या राजकीय पक्षात जातील की स्वतःचा वेगळा पक्ष काढतील याकडे अनेकांचे लक्ष लागले असताना आता स्वतः जरांगे पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे.
पुण्यात प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, ‘निवडणुक लढवणं हा आपला मार्ग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हाच आपला, माझा उद्देश आहे. राजकारण म्हटलं की, फोडाफोडीच आलीच, त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
असा असणार मुंबईला जाण्याचा मार्ग :
20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान आंदोलन स्थळी