Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. परंतु सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यापार्श्वभूमीवर आजपासून जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत.
मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, त्याबाबतचा कायदा मंजूर करावा. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे आज समाजबांधवांची बैठक घेऊन बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
एका सभेत जरांगे बोलताना म्हणाले होते की, “विरोधकांना मी एकटाच पुरेसाआहे, त्यांना मी पुरून उरेल, जो माझ्याविरुद्ध बोलतो त्याच्यात दम असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावे, त्याला पुरून उरेल. मला त्याच्या किती दम आहे, हेच पाहायचे आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मी १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
सगेसोयरे अद्यादेश पारीत होऊन त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहेच. त्यासाठी वेळेला जीव गेला तरी चालेल, मेलो तरी बेहत्तर, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असेही जरांगे म्हणाले होते.