पुणे -मध्य रेल्वेच्या रहदारीचा प्रमुख मार्ग असलेल्या भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या लाइनचे काम वेगाने सुरू आहे. यातील जळगाव-भुसावळ या 24 कि.मी. मार्गाचे काम यापूर्वीच पूर्ण होऊन चाचणीदेखील यशस्वी झाली आहे.मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गावर तिसरी लाइन टाकण्याचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्पात हा प्रकल्प प्राधान्यक्रमावर आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने निधीदेखील देण्यात आला आहे.
मुंबईच्या दिशेने भुसावळ ते मनमाडदरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे नियोजन करण्यात आले. यापैकी तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी चार टप्प्यात काम हाती घेण्यात आले. यात आतापर्यंत भुसावळ ते पाचोरा हे 71.72 कि.मी. मार्गावरील काम पूर्ण झाले असून, चाळीसगाव ते पिंपरखेड- 31.79 कि.मी. आणि नांदगाव ते मनमाड- 25.09 कि.मी. हा टप्पा पूर्णत्वाच्या जवळ असून, बहुधा या वर्षी ही लाइन कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
सध्या पाचोरा ते चाळीसगाव- 44.94 कि.मी. आणि पिंपरखेड ते नांदगाव- 10.40 कि.मी. हा टप्पा वेगाने पूर्ण करणे सुरू आहे. या संपूर्ण मार्गात 304 लहान, तर 22 मोठे पूल आहेत. तर, आता पुढील टप्प्यात चौथ्या लाइनम भुसावळ-जळगाव हा टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल.
एकूण अंतर : 183.94 कि.मी. प्रस्तावित खर्च : 1360.16 कोटी रु.
दर दहा मिनिटांनी एक ट्रेन
मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावर मनमाड-भुसावळ अप व डाऊन हे दोनच मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवर दर दहा मिनिटांनी एक ट्रेन धावते. ही वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. यापैकी भुसावळ विभागाने हा मार्गविस्तार हाती घेतला होता.
या मार्गावरील रेल्वे लाइनचे फायदे
- मुंबई-हावडा या व्यस्त मार्गावरील मनमाड-भुसावळ विभागातील गर्दी कमी होईल.
- रेल्वे प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होईल. त्यामुळे वेळेची बचत होईल.
- मुंबई, दिल्लीसह गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन्सचा खोळंबा कमी होणार.