– माधव विद्वांस
साहित्य समीक्षक व महाराष्ट्रातील विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा आज जन्मदिवस. कुरुंदकर यांचा जन्म आजोळी 15 जुलै 1932 रोजी हिंगोली जिल्ह्यात नांदापूर येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण बसमतला येथे झाल्यावर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला पुढील शिक्षणाकरता गेले. कुरुंदकरांचे मामा प्राध्यापक होते. आपल्या भाचाच्या अभ्यासू व जिज्ञासूवृत्तीची त्यांना जाण होती. त्यामुळे कुरुंदकर अगदी 10-12 वर्षांचे असताना त्यांचे मामा त्यांच्याशी इतिहास, पुराणे, तत्त्वज्ञान, साहित्य याबाबत चर्चा करत.
वयाच्या अकराव्या वर्षी कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एक कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली, पण ती छापून आली नाही. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल, पण तरीही आली नाही. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला. पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 11 वर्षे वाट पाहावी लागली.
किशोरवयातच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आले. ते रामनंदस्वामींचे अनुयायी झाले.त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. वर्ष 1948 मधे त्यांना अटक देखील झाली होती. एक क्रियाशील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख त्या काळात झाली होती. या काळात केलेल्या कार्यामुळे त्यांची समाजात ओळख निर्माण झाली.
वर्ष 1956 मधे बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला “सत्यकथा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. तेव्हा साहित्य क्षेत्राने त्यांची दखल घेतली. त्यानंतर मुंबईला मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं. विशेष म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटरपास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. पदवी नव्हती तरी ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. एमए पास झाले नव्हते तरी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते. त्याआधी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते तेव्हा त्यांचा “रिचर्डसची कलामीमांसा’ हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला होता.
एकदा प्राचार्य राम शेवाळकरांची मुलाखत होणार होती. पण शेवाळकरांना कळलं की, आपली मुलाखत एक शिक्षक घेणार आहे तेव्हा ते नाराज झाले. त्यांनी कॉलेजचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे तक्रार केली. त्यावर रामानंद तीर्थ म्हणाले, यात कमीपणा काय, यात तुमचा सन्मानच आहे. त्यानंतर कुरुंदकरांनी शेवाळकरांची मुलाखत घेतली. बघता बघता ही मुलाखत दोन तास रंगली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री देखील झाली.
वर्ष 1963 मधे ते एमए झाले. त्यानंतर पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते विद्यार्थ्यांबरोबर अतिशय प्रेमाने वागत. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आजारी पडली तर स्वतः ते काळजी घेत असत. त्यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय झाले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना सामाजिक प्रश्न व इतर विषय समजावून सांगत असत. व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी जागोजागी तरुणांचे प्रबोधन केले. कुरुंदकरांनी मनुस्मृती दहनाचे समर्थन केले होते.
आणीबाणीच्या काळात त्यांनी “इसापनीती’ हा विषय घेऊन व्याख्यानं दिली आणि लोकांना लोकशाहीचं महत्त्व या गोष्टींच्या आधारे पटवून देऊ लागले. समाजकारण व अध्यापनाबरोबर त्यांनी साहित्य सेवाही केली. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या, ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. 10 फेब्रुवारी 1982 रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.