माफीनाम्याला केराची टोपली
मुंबई – वादग्रस्त विधानांमुळे समालोचकांच्या पथकातून माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांची गच्छंती करण्यात आली होती. आता आयपीएल स्पर्धेसाठी समालोचकांचे पथक जाहीर करताना बीसीसीआयने मांजरेकरांना दूरच ठेवले आहे. त्यामुळे मांजरेकर यांनी सादर केलेल्या माफीनाम्याला केराची टोपली दाखवली गेल्याचे सिद्ध झाले आहे.
19 सप्टेंबरपासून अमिरातीत सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी समालोचकांच्या पथकाची घोषणा केली. यात सात भारतीय समालोचकांना स्थान देण्यात आले असून त्यातून मांजरेकर यांना बाहेरच ठेवण्यात आले आहे. 2008 सालापासून आयपीएलचे समालोचन केलेल्या मांजरेकरांना यंदा संधी नाकारण्यात आली आहे.
विक्रमादित्य सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, रोहन गावसकर, माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अंजुम चोपडा आणि हर्षा भोगले यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व येत्या गुरुवारी अमिरातीला रवाना होतील. या पथकाची रचना दोन समूहात करण्यात आली असून एक गट दुबई व शारजामधील सामन्यांचे समालोचन करेल तर, दुसरा आबूधाबीतील सामन्यांचे समालोचन करेल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान मांजरेकर यांनी हर्षा भोगले यांचा थेट प्रक्षेपण सुरू असताना पाणउतारा केला होता. मांजरेकर यांनी यापूर्वी रवींद्र जडेजा तसेच अन्य काही खेळाडूंबाबतही वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. तरीदेखील ते त्यांच्या भूमिकेत बदल करू शकले नाहीत.
अखेर बीसीसीआयने त्यांना समालोचकांच्या पथकातून डच्चू दिला होता. उपरती झाल्यावर मांजरेकर यांनी बीसीसीआयकडे माफीनामा सादर केला होता. त्याला कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी पुन्हा एकदा माफीनामा सादर केला. मात्र, त्यातही बीसीसीआयने त्यांना कोणतेही उत्तर दिले नव्हते.
करोनाचा धोका पसरण्यापूर्वी मार्च महिन्यात भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार होती. त्यातील धर्मशालातील सामना पावसाने रद्द झाला व त्याचवेळी करोनाचा धोका वाढल्याने उर्वरित सामनेही रद्द झाले. त्या मालिकेपासूनच बीसीसीआयने मांजरेकर यांची गच्छंती केली होती.