पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. करोनामुळे आंतरराज्यीय वाहतुकीवर लावलेले निर्बंध आता उठवले आहेत. त्यामुळे परराज्यात येथून मोठ्या प्रमाणात शेतमाल जात आहे.
परिणामी मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, शेवगा, मटार, कारली, दोडका यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील बाजारात रविवारी (दि. 6) 90 ते 100 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये बेंगळुरु येथून 1 टेम्पो मटार, गुजरात, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो कोबी, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, इंदौर येथून 9 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून 2 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची 14 ते 15 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले 1100 ते 1200 पोती, मटार 100 गोणी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 1500 ते 1600 पेटी, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, भुईमूग शेंग 100 ते 125 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, कांदा 100 ते 125 ट्रक, बटाटा आग्रा, इंदौर येथून 30 ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती आडते विलास भुजबळ यांनी दिली.