करोना परदेशातून भारतात आला आणि मग राज्य, शहर करत घराघरांत,लोकांच्या मनामनात भीतीचे सावट पसरवून बसला. प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करतो म्हणून प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरतो आणि तो जपण
यासाठी बावीस मार्चला जी संचारबंदी लावली होती आणि लोकांनी ती पाळली होती हे कौतुकास्पदच! म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतणार असेल तर लोकांची काहीही करण्याची तयारी असू शकते याचा प्रत्यय आला. पण दुसऱ्यांसाठी आपण या काळात काहीतरी केलेच पाहिजे असा विचार डोक्यात येताच त्यावर अंमलबजावणी करणारे देवदूतही आढळून आले; म्हणजेच माणुसकी अजून आपल्या देशात जिवंत आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
मला सेंटरच्या बाजूच्या शेजवलकर काकू म्हणाल्या, तुझ्या मुलांसाठी काहीही मदत लागणार असेल तर मला सांग. म्हणजे स्टाफ नसेल तर स्वयंपाकसुद्धा करून देईन. खरे तर सेंटरच बंद ठेवले आहे म्हणून मला तशी त्यांची गरज पडली नाही. पण त्यांचे हे शब्दच मला खूप मोलाचे वाटले. तसेही त्यांनी पंधरा दिवस आधी सेंटरला येऊन मुलांना हात कसे धुवायचे हे प्रत्येकाला त्यांनी वैयक्तिकरित्या सांगितले. हेही कौतुकास्पद नाही का?
मध्ये व्हॉट्सऍपला एक पोस्ट फिरली की रस्त्यावरच्या भिक्षेकाऱ्यांसाठी आणि रस्त्यावर काम करणाऱ्यांसाठी तोंडाला बांधायचे मास्क वजा कपडे संपलेले आहे. कुणाला शक्य असल्यास आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या मुलांच्या पालकांपैकी कुणीतरी ही पोस्ट वाचली आणि घरचे ब्लॉउज पीस आणून दिले. मुलांना फक्त याविषयी सांगितले तर प्रत्येकाने घरात असलेले ब्लॉऊज पीस पाठवले आणि त्या संस्थेपर्यंत आमचे कपडे मास्क म्हणून गेलेही आणि रस्त्यावरच्या भिक्षेकऱ्यांना दिलेही. ज्यांनी दिले त्याहीपेक्षा ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली ते लोक मला वेगळ्या वाटेवरची वाटली.
बिल्डिंग जवळच्या बंगल्यातल्या राजाध्यक्ष आजींनी शेजारच्या हॉस्टेलमध्ये निरोप पाठवला, मुलांनो, मेस बंद असेल तर बिनधास्त माझ्या घरी या. नाश्त्याची आणि जेवणाची सोय माझ्याकडून; शिवाय मोफत. मुले आधी बिचकली. “मोफत’ या शब्दांमुळे आणखीच बिचकली.कुणीही फिरकले नाही पाहून त्यांना अंदाज आला. शेवटी त्याच पंचवीस मुलांचा स्वयंपाक घेऊन होस्टेलला गेल्या आणि मुलांना जबरदस्तीने खाऊ घातले. सगळ्या मुलांना आवर्जून सांगितले, माझी सगळी नातवंडे परदेशात आहे.
त्यांच्यासाठी मला काहीच करता येत नाही, पण तुमच्यासाठी करून नातवंडांसाठी केल्यासारखे वाटेल शिवाय या भीषण प्रसंगी एकमेकांना साथ नको का द्यायला? मुले त्यामुळे गहिवरलीच;त्यापेक्षा परगावी असलेल्या त्यांच्या पालकांना जो दिलासा मिळाला तो पार काळजाला भिडणारा नाही का?
चौकातल्या डॉ. करमरकर यांनी तर आपला दवाखाना दिवस रात्र सुरू ठेवला. त्या डॉक्टरांसोबत तिथल्या नर्सही दिवसरात्र तैनात आहेत. डॉ. करमरकर गरिबांकडून पैसे घेत नाही आहेत, हे आणखी विशेष! डॉक्टरांना हे करावेसे वाटले इतपत ठीक आहे, पण त्या तिथल्या सगळ्या नर्स आळीपाळीने दिवसरात्र थांबतात. त्या सगळ्या घरच्या सदस्यांचे मला यासाठी विशेष वाटले की त्यांनी हे करण्याची मुभा त्या सगळ्यांना दिली. डॉक्टर्स आणि नर्स हे कर्तव्य म्हणून करत असले तरी त्यांच्या घरच्यांनी सामाजिक कर्तव्याची जबाबदारीही पेलली हेही वेगळ्याच वाटेवरचे आत्मभान आहे, असे म्हणायला हरकत नाहीच ना?
अप्परच्या मनीषाने घरातल्या परसबागेची भाजी लोकांना उपलब्ध करून दिली; ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांच्यासाठी. म्हणजे वसाहतीत राहणाऱ्या मोलकरणी किंवा वेठबिगारी म्हणून कामाला जाणाऱ्या बायका यांनाच ती भाज्या देते आणि सोबत स्वतःच्या शेतातील कडधान्यही देते. शिवाय या दिवसांत अन्नधान्य काटकसरीने कसे वापरायचे? हेही सांगते. त्याचबरोबर या काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची? साबणाने हात कसे धुवायचे? तोंडावर रुमाल कसा बांधायचा? हेही सांगतेय. स्वतःचा वेळ काढून लोकांसाठी वेळ सत्कारणी लावणे हे वेगळ्या वाटेवरचे काम नाही का?
करोनाच्या युद्धाला तोंड देण्यासाठी असे अनंत सैनिक सज्ज आहेत. स्वतःजवळ जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या जोरावर समाजापर्यंत पोचण्याचे काम ते करीत आहेत. वर लिहिलेली सगळी लोकं वेगळ्या मातीचीच आहेत नाहीतर प्रत्येकाने हे धाडस दाखवले असते; मात्र स्वकोशातून बाहेर डोकवायला आहे कुणाला वेळ? या वेळेस ही सगळीच वेगळ्या वाटेवरची माणसे लिहिण्याचे कारणच हे आहे की यातून बोध व्हावा आणि जगण्याचा नवा आयाम कळून स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाने स्वतःला द्यावी.
माणसाला जन्म एकदाच मिळतो. माणूस माणसासारखा कमी वागतो म्हणून त्याला आठवण करून देण्यासाठीसुद्धा असे प्रसंग उद्भवत असतील आणि चांगली माणसे नजरेत भरत असतील. कुणीतरी व्हॉट्सऍप वर एक छान पोस्ट टाकली आहे. मंदिरातले देव आता डॉक्टरांच्या रुपात दिसत आहेत; मला तर या सगळ्यांमध्येच देव दिसला! माझ्यातही हे देवपण यावे; स्वतःला मी माणूूस म्हणून सिद्ध करावे इतकेच!
डॉ. प्राजक्ता कोळपकर