मुंबई – महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतच चाललेली आहे. करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता १३५वर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास राज्यामध्ये लष्कराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केल्याचे समजते. यासंदर्भातील एका वेबसाईटने वृत्त दिले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी तीन आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदी लागू केली. मात्र शहरातील काही नागरिक संचारबंदीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून शहरात फिरत असताना दिसून आली. अशा नागरिकांना पोलिसांचा काठीप्रसादही मिळत आहे. मात्र, तरीही नागरिक ऐकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच राज्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामुळे आता राज्य सरकारने केंद्राकडे गरज पडल्यास लष्कर पाठवावे, अशी मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे.
दरम्यान, करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असून आजच करोनाविरोधातील मोहिमेला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. उपाय म्हणून काही उपाययोजना करण्यात आल्याचे नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या भारतीयांना इथे ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहेत, अशीही माहिती नरवणे यांनी दिली.