मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, जदयू असे अनेक पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधी निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या या घोषणांना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठा झटका दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. सत्तेत असूनही ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे यावर ममता बॅनर्जी यांनी सविस्तर पक्षाची भूमिका मांडली.
सागरदिघीमधील पराभवासाठी आपण कुणाला दोष देणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. “कधीकधी लोकशाहीमध्ये विकास हा सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतो. पण या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारची अनैतिक युती झाली होती. याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. भाजपानं आपली मतं काँग्रेसकडे वळवल्याचं दिसून आलं”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“निवडणुकीत प्रत्येकानं जाती-धर्माचं कार्ड वापरलं. भाजपानं अर्थात निवडणुकीला जातीय रंग दिलाच. पण काँग्रेस, माकपनंही मोठ्या प्रमाणावर या प्रकारचं राजकारण केलं. खरंतर भाजपाकडून मदत घेतल्यानंतर आता काँग्रेसनं स्वत:ला भाजपविरोधी म्हणणं बंद करायला हवं”, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर टीकास्र सोडले.
दरम्यान, ममता बॅनर्जींनी पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. “२०२४मध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. आम्ही लोकांच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवू. माझा विश्वास आहे की ज्यांना भाजपाला पराभूत करायचं आहे, ते नक्कीच तृणमूल काँग्रेसला मतदान करतील”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.