पुणे – इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार होतात. बऱ्याचदा परीक्षा न घेता गुणवाटप केले जाते. या प्रकारांना अखेर वाचा फुटली आहे. याबाबत तक्रारींचे पत्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे गेले. त्यानंतर त्यांचे डोळे उघडले आहेत. त्यावर अखेर उपाययोजना करण्याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांना सूचनांचा भडिमार करण्यात आला आहे.
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत बहुसंख्य ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी बोर्डाकडे आल्या. दरम्यान, असे प्रकार यापूर्वीही व्हायचे. पण, त्याकडे दुर्लक्षच केले गेले. अखेर याबाबत काही जणांचे पत्र आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात संबंधित तक्रारदाराने समस्यांचा पाढा वाचत बोर्डाच्या डोळ्यांत अंजन घातले आहे.
“इयत्ता अकरावी, बारावीच्या तुकड्या बंद पडू नयेत यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगला विद्यार्थ्यांची संख्या दाखवली जाते. विद्यार्थी अनुपस्थित असताना त्यांची हजेरी लावली जाते. परीक्षा न देता विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये उत्तीर्ण करून बारावीमध्ये प्रवेश दिले जातात. खासगी क्लास व कनिष्ठ महाविद्यालयांचे टाय-अप असते. त्यामुळे वर्गात विद्यार्थी नियमित उपस्थित राहत नाहीत. बोर्डाच्या परीक्षांचे अर्ज भरतात.
या संबंधित विद्यार्थ्यांची हजेरीही लावली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेला बसत नाहीत. तोंडी परीक्षाही देत नाही. महाविद्यालयांचा निकाल चांगला लागावा म्हणून विद्यार्थ्यांना बोगस गुणही दिले जातात. ही मूल्यमापन पद्धती बंद करावी. शिक्षकांची परवड थांबवावी. शिक्षण क्षेत्रातील या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी उपाययोजना राबवा,’ असे तक्रारदाराने पत्रात नमूद केले होते.
यावर पुणे बोर्डाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना दिल्या आहेत. असे प्रकार आढळल्यास जबर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.