पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्रशासन पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत होणार आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख २० हजार एवढ्या निरक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली असून, त्या सर्वांची परीक्षा घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सध्या दहावी- बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सध्या नातवंडांसह आजी- आजोबादेखील अभ्यासात मग्न असल्याचे दिसत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटांतील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून निरक्षर व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवनकौशल्ये विकसित करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंबकल्याण आदींचा समावेश आहे.
प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून, एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग- क (वाचन) ५० गुण, भाग- ख (लेखन) ५० गुण, भाग- ग (संख्याज्ञान) ५० गुण असे आहेत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील.
कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण मिळू शकतील; परंतु तीनही भागांचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल. मराठी माध्यमातून परीक्षा आयोजित करण्यात येईल. अपवादात्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची व्यवस्थाही करण्यात येणार आहे, अशी माहिती योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत्. यु- डायस क्रमांकानुसार निरक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल. त्यामुळे नजीकच्या केंद्रावरच परीक्षा देण्यासाठी जावे लागेल. – डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, योजना.