मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण खटल्याची नियमित सुनावणी आजपासून (दि. 3 डिसेंबरपासून) सुरु झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे कोर्टाची कार्यवाही पुढे सरकली नाही. या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यादेखील गैरहजर होत्या. त्यावर न्यायालयाने 19 डिसेंबरला सातही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तिघे कोर्टासमोर हजर झाले.
मात्र, या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीने हजर होऊ शकणार नाहीत, असे न्यायालयाला वकिलांतर्फे कळवण्यात आले. अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ट कोर्टांचे नियमित कामकाज आता सुरु झालेले आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए न्यायालयाने घेतला आहे.
दरम्यान, डिसेंबर 2020पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल, असे आश्वासन एनआयएने मुंबई हायकोर्टात दिले होते. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत. ज्यातील 300 हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे.