क्वालालंपूर :- मलेशियाचा नवोदित वेगवान गोलंदाज सयाझरूल इद्रुस याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अफलातून विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने आयसीसी टी-20 आशिया पात्रता स्पर्धेत चीन विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 8 धावांच्या मोबदल्यात तब्बल 7 गडी बाद केले.
या टी-20 सामन्यात चीनचा संघ 11.2 षटकांत केवळ 23 धावांत गारद झाला. त्यात एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. इद्रुसने 4 षटकांत एक षटक निर्धाव टाकताना 8 धावंत 7 बळी घेतले. पवनदीप सिंगने 1 तर, विजय उन्नीने 1 बळी घेतला.
मलेशियाने 4.5 षटकांत 2 गडी गमावून 24 धावा करत 8 गडी राखून हा सामना जिंकला. विरनदीप सिंगने नाबाद 19, तर श्रवण सुरेंद्रनने नाबाद 4 धावा केल्या. चीनकडून वॅंग की आणि तियान सेनक्वेन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
मलेशियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये नवखा आहे. इद्रुस हा आंतरराष्ट्रीय टी-20 पुरुष क्रिकेट सामन्यांमध्ये 7 बळी घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. इद्रुसच्या या कामगिरीच्या जोरावर मलेशियाने चीनवर आठ गडी राखून विजय मिळवला.
पीटर अहोचा विक्रम मोडला..
इद्रुस 32 वर्षांचा असून त्याने आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने टी-20 क्रिकेट सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा नायजेरीयाच्या पीटर अहोचा विक्रम मोडला. पीटरने अवघ्या 5 धावात 6 बळी घेतले होते.
टी-20 क्रिकेट इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा दीपक चहर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध 2019 साली अवघ्या 7 धावात 6 बळी घेतले होते. तर झिम्बाब्वेचा दिनेश नाकरानीने 7 धावात 6 बळी घेत चहरची बरोबरी केली होती.
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस पाचव्या स्थानावर असून त्याने 2012 साली झिम्बाब्वे विरुद्ध 8 धावात 6 गडी बाद केले होते.