मुंबई – नाशिकच्या इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी रंगली. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसने आपल्या काळात यासंबंधी काय केले? असा उलटप्रश्न केला. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार टाकला.
इगतपुरीत एका आदिवासी गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावही मांडला. इगतपुरीच्या सोनेवाडीत आदिवासी गरोदर महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली.
त्यातून ती इगतपुरीच्या दवाखान्यात पोहोचली असता तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे ती गरोदर महिला त्याच स्थितीत वाडीवरे गावात गेली. तिथे तिची प्रकृती एवढी बिघडली की तिचा मृत्यू झाला. आपल्या प्रगत राज्यात एक आदिवासी महिला केवळ उपचाराअभावी मृत्यूमुखी पडते ही स्थिती आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून या मुद्द्यावर चर्चा करावी, असे थोरात म्हणाले.
नाना पटोलेंच्या आक्रमक भूमिकेवर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावरही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यावरून त्यांनी सभागृहात जोरदार नारेबाजी केली. त्यातच कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड यांनीही या मुद्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. हे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारची बाजू स्पष्ट केली. तसेच विरोधकांचा समाचारही घेतला.
फडणवीसांकडून विरोधकांचा समाचार
या प्रकरणी उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारतर्फे या प्रकरणी निवेदन करण्यात येईल. पण विरोधकांना या प्रकरणी राजकीयच बोलायचे असेल, तर ते किती वर्षे सत्तेत होते? अशा गोष्टीत राजकीय बोलणे योग्य नसते. त्यामुळे कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये. केवळ एखाद्या पेपरच्या बातमीवर येथे चर्चा होत नसते. येथील काही नियम आहेत.
पण येथे केवळ राजकारण सुरू आहे. हे चालणार नाही. विरोधकांना गांभीर्याने चर्चा करायची असेल, तर सरकार त्यावर निवेदन करेल. या प्रकरणी काही उणिवा असतील, तर सरकार त्यावरही चर्चा करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. अखेर त्यांच्या या भूमिकेमुळे समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी नारेबाजी करत सभात्याग केला.