नगर – माळशेज घाटातील रस्ता खचल्याने नगर -कल्याण माळशेजमार्गे जाणाऱ्या एस टी सह सर्व वाहतुक बंद करण्यात आली आहे. घाटातील रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, तसे पत्रच तेथील तहसिलदार यांनी एस टी प्रशासनाला पाठविले आहे.
17 ऑगस्ट पासून माळशेज घाट रस्त्याच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने त्या दिवसापासूनच तारकपूर डेपोच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या. तर कल्याण, मुरबाड, ठाणे डेपोमधून नगर कडे येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने त्यासर्व गाड्या सध्या चाकणमार्गे धावत आहेत. तारकपूर एसटी डेपोतून दररोज 15 गाड्या नगर-कल्याण या मार्गावर धावतात मात्र माळशेजचा रस्ता बंद झाल्याने आळेफाट्या पर्यंत जाणार्या प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून तारकपूर बसडेपोतून प्रवाश्यांच्या गर्दी नुसार दिवसाकाठी 7 ते 8 गाड्या आळेफाट्यापर्यंत सोडण्यात येतात. दरम्यान पुरामुळे अन्य डेपोतून सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या बंद होत्या. त्या आता सुरू करण्यात आल्या आहेत.