दार्जिलिंग -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध केला. महुआ मोठ्या मताधिक्याने संसदेत परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, संसदेत मोठे बहुमत असल्याने काहीही करू शकतो असे भाजपला वाटते. मात्र, भाजपने आपण एक दिवस सत्तेत नसू हे ध्यानात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला.
ममतांनी पत्रकार परिषद घेऊन तृणमूल ठामपणे महुआंच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली. महुआंची लोकसभेतून हकालपट्टी म्हणजे संसदीय लोकशाहीशी विश्वासघात आहे. आम्हाला निवडणुकांत हरवता येत नसल्याने भाजपकडून सुडाचे राजकारण खेळले जात आहे. संसदेत महुआ यांच्या विरोधात सुमारे ५०० पानी अहवाल सादर करण्यात आला.
त्यावर चर्चेसाठी सर्व पक्षांना केवळ ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला. एवढ्या कमी वेळेत तितके पाने कशी काय वाचली जाऊ शकतात? बंगाल विधानसभेत तृणमूलला दोन-तृतीयांश बहुमत आहे. तसे असूनही आम्ही कुणाची मनमानीपणे हकालपट्टी करत नाही.
संबंधित प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप न केल्याची खंत वाटते, असे त्या म्हणाल्या. संसदेत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचे सदस्य महुआंच्या पाठिशी उभे राहिल्याचे दिसून आले. त्यावरून ममतांनी भाजपच्या विरोधात एकवटल्याबद्दल इंडियाचे आभार मानले.