मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘लोक माझे सांगाती’ आवृत्ती 2 च्या प्रकाशन सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच, त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने देखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि ‘शरद पवार यांनी कोणत्या कारणासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला हे सांगणे कठीण आहे, आम्हाला असे वाटते की ते शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात राहून ते एका विचारधारेशी लढतील. परंतु त्यांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणांनंतर सभागृहामध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पडला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावरदेखील झाले होते. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरले आहे. याशिवाय जयंत पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते यावेळी पवारांच्या बाजूला स्टेजवर उपस्थित होते.