राजगुरूनगर – वाळद (ता खेड) येथे पैशाच्या कारणावरून दोन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. याचा राग मनात धरून मायलेकीस कोयत्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही शुक्रवारी (दि. 22) दुपारी 5 च्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तिघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
आकाश हुरसाळे (रा. हुरसाळेवस्ती, मंदोशी, ता. खेड), राहुल ऊर्फ डॅनी बांगर (रा. वाळद, ता. खेड), आशु मोरे (रा. शेटेवाडी, वाडा ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर बाळासाहेब भागुजी कोरडे (वय 53 रा. वाळद, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मुंबईवरूरन आल्यावर त्यांनी वाळद येथे फिर्यादी कोरडे यांच्या घराजवळ येऊन कोरडे यांच्या पत्नीस तुझा पती कोठे आहे. त्याला जीवे मारायचे आहे, असे म्हणून कोयते हातात धरून नाच करून दहशत माजवत घरासमोर उभी असलेल्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.
फिर्यादीची मुलगी निलम विक्रम पोखरकर हिचे पोटात व गुप्त भागावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर फिर्यादीची पत्नी शारदा बाळासाहेब कोरडे हीस कोयत्याने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादी त्यांचा मुलगा योगेश बाळासाहेब कोरडे यांचा खून करून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.