नांदेड : शनिवारी दिवसभरात हिंगोलीतील तब्बल ५० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता एकूण १५१ वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे.
मालेगाव व मुंबईला बंदोबस्तासाठी जाऊन परतलेले राज्य राखीव दलाचे शंभराच्या आसपास जवान पॉझिटिव्ह निघाल्याने हिंगोलीची चिंता वाढली होती. एकेक करीत त्यांना बरे करून घरी पाठवण्याची प्रक्रिया संपत असताना शनिवारी दिवसभरात तब्बल ५० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे. हे सर्व नवीन बाधित मुंबईसह इतर शहरांमधून परतलेले किंवा स्थानिक बाधीतांच्या संपर्कात आलेले रूग्ण आहेत.
शुक्रवार अखेर (दि.२२ मे) हिंगोलीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा आकडा १०१ पर्यंत गेला होता. परंतु शनिवारी धक्क्यामागून धक्के बसत गेले. सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले. यात यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे जण होते. वसमत येथील दोन जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जण उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व जण मुंबईहून परतलेले प्रवासी आहेत. या सर्वांना आधीच क्वारंटाईन केले होते.
सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे अहवाल आले. यात सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगावच्या विलगीकरण कक्षातील सुरजखेडा गावात मुंबईहून परतलेला एकजण बाधित आढळला आहे.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हिंगोली येथील लिंबाळा विलगीकरण कक्षात असलेल्या तब्बल 31 जणांचा कोरोना अहवाल एकदाच पॉझिटिव्ह आला आहे. यात मुंबईहून परतलेले 22, औरंगाबादहून परतलेले चार, रायगडहून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील दोघांसह एका डॉक्टरलासुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येते.