मंचर – सध्या राज्यभरातील लोकांना आपापल्या घरी सोडण्यासाठी सरकारने राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या वतीने एसटी बसची सुविधा उपलब्ध केली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप एसटी कामगारांनी केला आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने अनेक कामगांरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्यभरातील एसटी मागील दीड महिन्यापासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही मिळाले नाहीत. पगाराअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. एसटी प्रशासनाच्या बस मागील दीड महिन्यापासून ठप्प असल्याचा फटका महसुलात मोठी घट होण्यात झाला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी पगार असतो.
हा पगारही वेळेवर होत नाही. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारच्या अगदी प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाही. अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने जीवनावश्यक वस्तूही देण्यात न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
चालकाच्या वैद्यकीय तपासणीची सोय व्हावी
सध्याच्या काळात या कर्मचाऱ्यांना घरीही जाता येत नाही. त्यामुळे कुटुंबियांचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न आहे.राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सोय करण्यात आली आहे.संबधित एसटी चालकाला मास्क, सॅनिटायझर आणि वैद्यकीय तपासणीची सोय आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी एसटी चालकांनी केली आहे.