मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे राज्याला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील या महत्वाच्या घडामोडीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मनं दुखावली, की महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात राज्यपाल कसा नसावा, याचं उदाहरण म्हणून लोक जर कुणाचं नाव सांगतील तर ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं.” असे अंधारे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग कोशारीजी.
महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती !@SaamanaOnline@ShivSena @ShivsenaComms #अतिथी_कब_जाओगे— SushmaTai Andhare (@andharesushama) February 12, 2023
याचबरोबर, “इडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जरा जरी चाड असती, तर असा राज्यपाल केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावा. याचं विनंती पत्र त्यांनी तत्काळ लिहिलं असतं. जेव्हा ते महापुरुषांबद्दल वारंवार ठरवून खोडसाळपणे गरळ ओकत होते. परंतु आता राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्याची जी इडी सरकारने केलेली खेळी किंवा जो मानभावी पणा आहे ही सरळसरळ निवडणुकीच्या तोंडावरची खेळी आहे.
लोकांच्या ज्या दुखावलेल्या अस्मिता आहेत त्याला मलमपट्टी लावण्याचा अत्यंत थातुरमातूर प्रकार हा राजीनामा मंजूर करून केला आहे. पण यामुळे कोश्यारींनी एकूण केलेल्या वक्तव्यांनी झालेली महाराष्ट्राच्या अस्मितेची हेळसांड भर निघणार नाही.” असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच “जर खरोखरच त्यांना आपण केलेल्या चुकीची जाणीव असती, तर किमान एकदा तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती, माफी मागितली असती.” असे म्हणत अंधारे यांनी टीका केली आहे.