पिंपरी, (प्रतिनिधी) – देहूगावमधील संत तुकाराम सोसायटी लगत सुरू असलेला लोखंडी कारखाना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. तसेच महावितरण कार्यालयाला आणि नगरपंचायत श्री क्षेत्र देहूगाव यांना बेकायदेशीर कारखान्याची वीज तसेच पाणी बंद करण्याचे आदेश दिले. या बाबत या दैनिक प्रभातने नागरिकांचा आवाज शासकीय अधिकाऱ्यांन पर्यंत पोहचवण्यासाठी खुप मदत केल्याबद्दल रहिवाशांनी आभार मानले.
संत तुकाराम सोसायटीमधील नागरिकांना, अबाल वृद्धांना, शाळकरी विद्यार्थ्यांना होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या त्रासा बाबत गेल्या काही महिन्यांपासून त्रास होत होता. येथील रहिवाशांसाठी स्वतःच्या घरातून बाहेर निघणे किंवा खिडक्या दारे उघडे ठेवणे अवघड झाले होते. स्वतःच्या घरात कोंडून घेऊन देखील पेंटचा उग्र वास आणि लोखंडाचा कर्णकर्कश आवाज यामुळे नागरिकांना घसा दुखणे, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ या सारखे आजार होत आहेत.
परिणामी संत तुकाराम सोसायटी येथील नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड स्थानिक प्रशासन मुख्य अधिकारी, श्री क्षेत्र देहूगाव नगरपंचायत यांना वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
गुरुवारी (१४) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारी रवींद्र आंधळे यांनी कश्यप इंडस्ट्रीज ही बेकायदा विनापरवाना सुरू असलेला लोखंडी कारखाना बंद करावा. त्या कारखान्याचे वीज आणि पाणी कापावे असे आदेश महावितरण कार्यालय आणि श्री क्षेत्र देहुगाव नगरपंचायत यांना दिलेले आहेत.
या आदेशामुळे सोसायटीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल आणि नागरिकांची प्रदूषणाच्या होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होईल. याबाबत दैनिक प्रभातने नागरिकांचा आवाज शासकीय अधिकाऱ्यांन पर्यंत पोहचवण्यासाठी खूप मदत केली. त्याबद्दल रहिवाशांनी आभार मानले.