मुंंबई :- राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या सर्वेक्षणाचा सध्या खेळ सुरु आहे. यात अनेकांची टक्केवारी दाखवली जाते. ९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीत आहेत, अशी मिश्कील टिप्पणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात झालेल्या शिंदे गटाच्या राजकीय बंडासाठी शरद पवारांकडे बोट दाखवले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचा चांगलाच समाचार घेतला. बावनकुळे यांना या बंडाची कल्पनाही नव्हती. ज्या व्यक्तीला एक जागा मिळाली नाही, त्यांना कोणी गुप्त गोष्टी सांगेल का? असा खोचक टोला त्यांनी लगावला.
पुढे आव्हाड यांनी आदिपुरुष चित्रपटाबाबतही आपली भूमिका मांडली. या चित्रपटाने माझ्यासारखा रामभक्त प्रचंड दुखावला आहे. या चित्रपटाचे लेखक स्वत:ला हिंदुत्ववादी समाजतात. त्यांच्याकडूनच वादग्रस्त संभाषण येते, या चित्रपटातील पात्रांचे चेहरेदेखील विकृत दाखवण्यात आले आहेत, यातून नेमके काय दाखवण्याचा प्रयत्न झाला, हे त्यांनाच माहीत… असे ते म्हणाले.
तसेच २० जून २०२२ रोजी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिवस म्हणून निषेध व्यक्त करणार आहे. हा महाराष्ट्रातील एकच प्रसंग आहे जो प्रत्येकाच्या घराघरात गेला आहे. उद्याचा दिवस हा पन्नास खोक्यांचा, पलायनाचा, गद्दारीचा दिवस आहे. त्यामुळे उद्या केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.