मुंबई: देशात करोनाचा संसर्ग महाराष्ट्रात सर्वाधिक पसरत आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांची संख्या 2334 झाली आहे तर मृत्यूची संख्या 160 वर पोहोचली आहे, त्यापैकी मुंबईतील 101 जणांचा समावेश आहे. एका संकेतस्थळावर याबाबतची माहिती आकडेवारीसह दिली गेली आहे.
मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 1540 बाधित समोर आले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात एकूण 352 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यापैकी 242 नवीन प्रकरणे मुंबईची आहेत. त्याचवेळी, सोमवारी करोना संक्रमणामुळे राज्यात 11 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 9 लोक मुंबईचे आहेत. अशाप्रकारे पाहिल्यास, देशात कोरोनामुळे मरण पावलेला प्रत्येक दुसरा माणूस महाराष्ट्रातील आहे आणि प्रत्येक तिसरा माणूस मुंबईचा आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर करोनावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई वेगाने करोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनत आहे. मुंबईला चीनमधील वुहान शहराप्रमाणे करोना संसर्गाचे आकर्षण केंद्र असे म्हटलं जात आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्याही सर्वाधिक आहे. महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढत आहेत. कारण झोपडपट्ट्यांमध्ये हळूहळू व्हायरस पसरत आहे. धारावी व्यतिरिक्त, ज्याला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हटले जाते, करोनाचे संक्रमण आता बहरामपाडा आणि वांद्रे टर्मिनसलगतच्या कुर्ल्याच्या जरीमरी या झोपडपट्ट्यांमधे पसरले आहे.
1 मार्चपासून मुंबईत आंशिक लॉकडाउन सुरू झाले होते आणि 23 मार्चला सर्व ठिकाणी लॉकडाऊन झाले. परंतु सरकारने वारंवार आवाहन करूनही लोकांनी प्रवास करणं थांबवले नाही. मग सरकारने सक्तीने लोकल ट्रेनची हालचाल पूर्णपणे बंद केली. राज्यात जसजसे तपासणी आणि चाचणी वाढू लागली, तसतसे मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली.