मुंबई – सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी आज एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’समोर आत्मसमर्पण केले. दक्षिण मुंबईत कंबाला हिल भागातील “एनआयए’च्या कार्यालयात तेलतुंबडे, त्यांच्या पत्नी रमा तेलतुंबडे आणि मेव्हणे-दलित नेते प्रकाश आंबेडकर हजर झाले. आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. तर नवलखा हे मुंबईतील “इकॉनॉमिक ऍन्ड पॉलिटिकल वीकली जर्नल’चे अनेक वर्षे संपादक होते.
सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी 17 मार्च रोजी या प्रकरणातील सहआरोपी आनंद तेलतुंबडे आणि नागरी हक्कविषयक कार्यकर्ते गौतम नवलाखा यांची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावली होती आणि या दोघांना तपास संस्थांपुढे आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तेलतुंबडे आणि नवलखा यांनी “एनआयए’पुढे आत्मसमर्पण केले, असे त्यांचे वकिल मिहीर देसाई यांनी सांगितले.
तेलतुंबडे आणि नवलखा यांच्याशिवाय अन्य काही जणांवर माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदींखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर पुणे पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्वांनी 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणे केली होती. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला होता, असा पोलिसांचा दावा आहे.
हे कार्यकर्ते बंदी घातलेल्या माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. हे प्रकरण नंतर “एनआयए’कडे वर्ग करण्यात आले.