मुंबई – थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र (Maharashtra) आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर (World Trade Center) येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगसमूहांचा आणि उद्योजकांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जग आता भारताकडे (India) आश्वासकपणे पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या प्रयत्नामुळे “जी-20’चे डिक्लरेशन यशस्वी झाले. नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा “जी’20’ समूहात समावेश झाला.
चीनचे औद्योगिक प्राबल्य दिवसेंदिवस कमी होत असून भारताचे प्राबल्य वाढते आहे. जपानमध्ये तंत्रज्ञान आधारित उद्योगात आता नवा विचार रुजतो आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन पर्यंतही जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन
महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन (growth engine) आहे. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे “कॅपिटल’ बनले आहे. मुंबईत पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू आहे. ट्रान्स हार्बर लिंक क्रांतिकारक ठरणार आहे. पुण्यातील रिंगरोडमुळे (Ring Road Pune) उत्पादन क्षेत्रात मोठे बदल होतील.
पुण्याजवळ नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. नागपूर आता लॉजिस्टिक कॅपिटल बनत आहे. समृद्धी महामार्गामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढली आहे. वाढवण बंदर सर्वात मोठे बंदर ठरणार असून भूमिपुत्र आणि मच्छीमार यांना विश्वासात घेऊनच येथे विकास करण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.