जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा वर्षांचा हिशोब मागणाऱ्या शरद पवारांनी गेल्या ५० वर्षांत काय केले, महाराष्ट्र त्यांचा भार वाहतोय, असे म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी जळजळीत टीका केली. ते मंगळवारी जळगाव येथील युवा संसद मेळाव्यात बोलत होते. राहुल गांधींचे यान १९ वेळा लॉंच केले, पण ते अपयशी ठरले.
सोनियांना राहुल यांना पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हणत त्यांनी राजकीय घराणेशाहीवर टीकेची झोड उठवली. ‘मविआ’च्या ३ चाकी रिक्षाचे टायर पंक्चर झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
शहा पुढे म्हणाले की, या नेत्यांना लोकांसाठी काहीही करायचे नाही. प्रत्येकाला स्वतःच्या नातेवाईकांना मोठे करायचे आहे. सामान्यांसाठी आणि तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असा दावाही त्यांनी केला.
सोनिया-मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये सातत्याने बॉम्बस्फोट झाले. मात्र, मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन आतंकवाद्यांचा खात्मा केला. दुसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, तेव्हा ३७० कलम हटवले.
त्यामुळे रक्ताचे पाट वाहतील अशी भीती घातली. मात्र, एकही हल्ला झाला नाही. मोदींनी देशाला सुरक्षित व समृद्धी करण्याचे काम केले. मोदींची गॅरंटी देण्यासाठी मी या ठिकाणी आल्याचे ते म्हणाले.