पुणे -वाढते शहरीकरण, लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे राज्यातील मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. यंदा हा आकडा 55 वर पोहचला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाचा “पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’ अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यातून या नोंदी समोर आल्या आहेत. यामध्ये म्हटल्यानुसार देशभरातील तब्बल 311 नदीपट्टे धोक्यात आले आहेत. पर्यायाने त्यातील जैवविविधता आणि नदीची एकूणच परिसंस्था अंतिम घटका मोजत आहेत. अहवालानुसार महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेश, बिहार व केरळ आणि कर्नाटक व उत्तर प्रदेश ही राज्ये द्वितीय-तृतीय आणि चौथ्या स्थानी आहेत.
शहरे आणि उद्योगांमधील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये आणि इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत यापूर्वी अनेकदा व्यक्त करण्यात आले आहे.
सर्वाधिक प्रदूषित नद्या
भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, पवना, इंद्रायणी या नद्यांची पात्रे या पहिल्या सूचीमध्ये आहेत. यासोबतच अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, कलू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांचे पट्टे प्रदूषित झाले आहेत.
अन् असाही दुर्दैवी योगायोग…
पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच नदीसंबंधी “धारा-2023′ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात जलशक्ती मंत्री शेखावत यांच्यासह अन्य मान्यवर आले होते. त्यांनीही “प्रोटोकॉल’नुसार नद्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. तज्ज्ञांनी मते-मतांतरे मांडली. अतिशय भव्य स्वरुपात ही परिषद झाली. पण, नद्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही ठोस अशी घोषणा झाली नाही. तर, आता याचदरम्यान नद्यांची वस्तूस्थिती मांडणारा हा अहवाल आला आहे.